Hebrews 10 in Marathi

1 कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.

2 जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुध्द झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते.

3 परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात.

4 कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.

5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.

6 होमार्पणांनी व पापाबदृलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.

7 मग मी म्हणालो, ‘हा मी आहे! नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे.

8 वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अर्पणे, होमार्पणांने व पापाबदृलची अर्पणे,हयांची इच्छा तुला नव्हती,व त्यात तुला संतोष नव्हता. (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात तरी देखील.)

9 मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली.

10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.

11 प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.

12 परंतु आपल्या पापांसाठी ख्रिस्ताने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण सर्वकाळासाठी एकदाच केले,व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.

13 आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे.

14 कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.

15 पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,

16 परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात ठेवीन आणि ते त्यांच्या मनावर लिहीन.”

17 “आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.”

18 जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्यकता भासणार नाही.

19 म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण निर्धास्तपणे परमपवित्रस्थानामध्ये प्रवेश करतो.

20 त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्र स्थानात पाऊल ठेवू शकतो

21 कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.

22 म्हणून आपण आपली मलीन विवेकबुद्धि शुध्द करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने असे खऱ्या अंतःकरणाने विश्र्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.

23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.

24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.

25 आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन दयावे.

26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.

27 पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.

28 जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो.

29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले,कराराच्या ज्या रक्ताने त्याला पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!

30 कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”

31 जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.तुम्ही आपला आनंद व धैर्य गमावू नका.

32 ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.

33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.

34 जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला. आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.

35 म्हणून धैर्य सोडू नका,त्याचे प्रतिफळ माेठे आहे.

36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हाला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.

37 कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे; “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.

38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”

39 परतु ज्यांचा नाश हाेईल अशा 'माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी 'विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.